खुशालीला जाऊन बरोबर एक वर्ष झाले. अजूनही मला खुशाली सोडून गेली, हे सत्य पचवता आलेले नाही. त्यातून अजूनही मी सावरलेलो नाही. खुशाली हे माझं स्वप्न होतं. तिनं मला स्वप्नवत जगवलं आणि स्वप्नासारखीच ती सहज सोडून गेली. आपल्या प्रत्येक कवितेसारखीच ती जगली. जे खरं आहे, शाश्वत आहे ते तिनं आपल्या कवितेतून मांडलं. उणापुरा आमचा २९ वर्षांचा संसार. अगदी कथेतल्या गोष्टीसारखा. मी खुशालीला पहिल्यांदा पाहिलं ते ९ वीत असताना. आमच्या जवळच्याच सुयश क्लासला ती यायची. एकमेकांकडे पाहून डोळ्यांचे हावभाव व्हायचे. डोळयांची भाषा डोळयांनाच समजली. बोलणं व्हायचंच नाही पण एकमेकांना पाहिल्याशिवाय दिवस सरायचा नाही. खुशी ११ वीला गेल्यानंतर मी काहिसा धीर करत, घाबरत, बावरतच आपणास तू आवडत असल्याची कबुली दिली. खऱ्या अर्थानं खुशाली आताशी कुठे परिपक्व व्हायला सुरुवात झाली होती. तिनं लगेचच मला हो म्हटलं नाही. ती लाजली पण खरी गोष्ट एकमेकांना समजली होती. मनातलं माझ्या ओठांवर आलं होतं. ती त्यानंतर माझ्याबरोबर फिरायला येऊ लागली. आम्ही प्रेमानं खूप भारलो होतो. तिच्या घरातली मंडळी तटस्थ होती पण फारसे आढेवेढे न घेता विवाहाला संमती मिळाली. खुशी हसरी, साधी सरळ होती. माझ्यावर तिचे अतोनात प्रेम होते. आमच्या संसारवेलीवर प्रथम मुलगी जन्माला आली पण काही अपरिहार्य कारणामुळे ती सोडून गेली. त्यानंतर माझा मुलगा अमेयचा जन्म झाला.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : काव्यफुलोरा